गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलं होत की, शिवसेनेला 56 वर्ष झाली. या 56 वर्षांत शिवसेनेवर अनेक आघात झाले आहेत, पण शिवसेना कधी संपली नाही, उलट अधिक जोमाने वाढली. आता ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे.
भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरेंची बडबड हताश आणि अहंकारी माणसाची आहे. ते आधीही घरात बसून होते, त्यांनी आताही घरात बसून रहावं. घरात बसून राहणाऱ्या माणसांना वादळाची भीती नसते.
उद्धव ठाकरेंकडे आता फक्त 15 आमदार राहिले आहेत. त्यापेक्षा कितीतरी आमदारांनी उठाव केला, पण त्याचं उद्धव ठाकरेंना काहीच वाटलं नाही, असंही भातखळकर म्हणाले.
दरम्यान, सुष्मा अंधारेंवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बोलताना भातखळकर म्हणाले, या त्याच अंधारे आहेत, ज्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्रांवरही टीका केली होती. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा आहे, तर त्यांनी न्यायालयात जावं.