अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशात भाजप नेते नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप केलाय.
एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
लोकांमध्ये 24 तास काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिली. ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ठाकरे गटाच्या वतीने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या बाबतीत सहानुभूतीचं कार्ड यावेळी चालणार नाही, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येतोय.