Saturday, April 20, 2024

महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय – संजय राऊत

देशमहाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून पु्न्हा सुरु झालेला महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न मंगळवारी चिघळला आहे. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली. याचे महाराष्ट्रात पडसाद तीव्र पडसाद उमटले. मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौराही लांबणीवर गेल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणे करुन टाकलय असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढ पणा आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!,” असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे.

कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकची नासधूस करण्यात आली. कर्नाटक पोलीस आणि वेदिकेचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याच या प्रकरणावरुन फोनवरुन चर्चा झाली. दोन्ही बाजूला शांतता राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या हल्लाप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले.

• आमचाही संयम सुटू शकतो – शरद पवार

या हल्ल्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेचा निषेध केला. “सीमाभागात हिंसाचाराच्या घटना आताच कशा घडल्या आहेत. त्यातून जर काही अघटित घडल्यास त्याला बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. आमचाही संयम सुटू शकतो. याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles